पुणे : विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावायची हा जागतिक पातळीवरील गहन प्रश्न बनला असल्याने त्याबद्दल जगभर संशोधन सुरू आहे. याबाबत नुकत्याच इटलीत झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पुण्यातील दोन मुलींच्या संशोधनाची दखल घेण्यात आली. सायली पोंक्षे आणि गौतमी भोर या दोघींनी सॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट लावणारे छोटे यंत्र विकसित केले आहे.
शहरात निर्माण होणारे या कचऱ्याचे प्रमाण, त्याची लावली जाणारी विल्हेवाट, त्यातून होणारे नदी, मातीचे प्रदूषण, सध्या वापरण्यात येणाऱ्या विघटन प्रक्रियेचा खर्च अशा विविध मुद्द्यांवर या दोघींनी सर्वेक्षण केले. अभ्यास केला आणि घरगुती पातळीवरच या सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने या संकल्पनेवर संशोधन केले. त्यातून त्यांनी विकसित केले ‘दाहिनी’ हे छोटेसे यंत्र. प्रत्येक घरात किंवा सोसायटीतील प्रत्येक मजल्यावर हे यंत्र बसवून या कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल आणि तीही पर्यावरणाला हानी न पोहोचवता.
त्यांचा हा अभ्यास प्रबंध सादर करण्याकरिता त्यांना नुकत्याच इटलीतील रोम येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’मध्ये बोलावण्यात आले होते. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या या परिषदेत त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाची उपस्थितांनी प्रशंसा केली. त्यांच्या उपकरणाचे कौतुक झाले. जगभरातील या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या संकल्पना, अभ्यास जाणून घेण्याची संधी सायली आणि गौतमी यांना मिळाली.
‘दाहिनी’ हे अगदी आटोपशीर यंत्र असून, प्रत्येक घरात ते बसवणे शक्य आहे. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स जाळले जातात; मात्र त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत वापरली गेली असल्याने त्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइडसारख्या वायूंचे प्रमाण अगदीच अत्यल्प असते. तसेच त्यातील घटक जळल्यानंतर निर्माण होणारी राखही अगदी अत्यल्प असते. ती झाडांना खत म्हणून वापरता येते. याची किंमतही माफक आहे. यासाठी आर्थिक साह्य मिळाल्यास ती आणखी कमी करणे शक्य होईल.
आपल्या देशात दर वर्षी सुमारे नऊ हजार टन इतका प्रचंड कचरा हा सॅनिटरी नॅपकिन्सचा असतो. एक सॅनिटरी नॅपकिन संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. यात वापरण्यात आलेले प्लास्टिक, रासायनिक घटक यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. हा कचरा मातीत किंवा पाण्यात टाकला जातो. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होतेच; पण सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होतो. स्त्रियांच्या आरोग्याच्यादृष्टीने चांगला आणि वापरातील सहजता तसेच सहज उपलब्धता यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर वाढला आहे. अलीकडे किफायतशीर किंमतीत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करण्यात येत असून, त्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे, मात्र याबरोबरच त्याच्या विल्हेवाटीची शास्त्रीय आणि पुरेशी यंत्रणा उभारणेही आवश्यक आहे. त्यासाठी अशी छोटी यंत्रे उत्तम उपाय ठरू शकतील. मोठ्या शहरांमध्ये या कचऱ्याचे विघटन करणारी मोठी संयंत्रे बसवण्यात आली आहेत; मात्र प्रचंड लोकसंख्या, कचऱ्याचे प्रचंड प्रमाण आणि तो उचलण्याची, त्याचे वर्गीकरण करून ती योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उपलब्ध यंत्रणेपर्यंत पोहोचवणे ही सगळी व्यवस्था अपुरी आहे. ज्याप्रमाणे ओला कचरा घरच्या घरी विघटन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, तसेच प्रोत्साहन हा सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा घरच्या घरी विघटन करण्यासाठी देणे आवश्यक आहे.
सायली आणि गौतमीच्या या संशोधनाने जागतिक पातळीवरील या समस्येवरील संशोधनात भारताचे आणि पुण्याचे नाव झळकले आहे. सायली आणि गौतमी या दोघीही आयटी इंजिनीअर असून, सायलीने एक वर्ष नामांकित आयटी कंपनीत काम केल्यानंतर नोकरी सोडून उद्योजक रवींद्र गद्रे यांच्यासमवेत पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी ‘ग्रीन अर्थ इक्विपमेंट’ ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपकरणे तयार करते. पर्यावरणरक्षण हा आवडीचा विषय असल्याने गौतमी सायलीसोबत काम करत आहे. सायली आणि तिची मित्रमंडळी सामाजिक कार्यातही सक्रिय असून, ‘दी एक्स्टसी क्लब’ या त्यांच्या संस्थेतर्फे त्यांनी अंगणवाड्यांचा कायापालट करण्याची मोहीमही हाती घेतली आहे.
(अंगणवाड्यांच्या या मोहिमेबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
अधिक माहितीसाठी संपर्क : सायली पोंक्षे - ८९९९८ ४५१३३ , रवींद्र गद्रे : ९२२५६ १२९५६
इमेल : greenearthequip@gmail.com